अल्पवयीन मुले आणि मुली घरातून निघून जात असल्याच्या घटनांत वाढ झाली आहे. बदलापूर पश्चिमेतील दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची माहिती मिळताच पोलिस सजग झाले. चार अपहरणकर्त्यांनी बदलापूर येथून तिला बेशुद्ध करून अपहरण केले, मात्र अपहरणकर्त्यांच्या तावडीतून आपण सुटका केल्याचे सांगत परळ येथून या विद्यार्थिनीने आपल्या वडिलांशी संपर्क साधला होता. मुलीच्या वडिलांनी या गंभीर प्रकरणाबाबत दादर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. मात्र विद्यार्थिनी बदलापुरात राहत असल्याने दादर पोलिसांनी हा गुन्हा बदलापूर पोलिसांकडे वर्ग केला होता. बदलापूर पोलिसांनी तपासादरम्यान परळ रेल्वे स्टेशन आणि परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, त्यांना कुठेही अपहरणकर्ते आढळून आले नाहीत. पोलिसांचा या अपहरण प्रकरणात संशय बळावल्याने त्यांनी पुन्हा विद्यार्थिनीकडे कसून चौकशी केली असता, आपणच या अपहरणाचा बनाव केल्याचे तिने कबूल केल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर दहावीच्या ऑफलाइन परीक्षेच्या भीतीने आपण हा बनाव केल्याचे या विद्यार्थिनीने सांगितले आहे.
त्यामुळे करोना काळात शिक्षणापासून दुरावलेल्या विद्यार्थ्यांचे समुपदेशन आणि त्यांच्या मनात परीक्षांबाबत असलेल्या भीतीबाबत पालिकांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधत त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज व्यक्त होत आहे.