आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली ट्वीटद्वारे माहिती ; जाणून घ्या काय म्हणाले आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये करोनाबाधितांची संख्या आणि रुग्णालयात दाखल होण्याचं प्रमाण यामध्ये मोठ्या प्रमाणावर घट आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यात लागू असलेले करोनासंदर्भातील काही नियम शिथिल करण्याच निर्णय आज राज्य सरकारकडून घेण्यात आलेला असताना, आता राज्यातील नागरिकांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज दिवसभरात राज्यात कोरनामुळे एक मृत्यू झाला नाही. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी ट्वीटद्वारे ही माहिती दिली आहे.
“महाराष्ट्रासाठी अत्यंत दिलासादायक बातमी! १ एप्रिल २०२० पासून पहिल्यांदाच आज राज्यात एकही कोव्हीड मृत्यू झालेला नाही. राज्यातील ११ कोटी जनतेच्या साथ व सहकार्याने आपण कोरोनाविरद्धच्या या लढाईत संपूर्ण विजय मिळवू, असा मला विश्वास आहे.” अशा शब्दांमध्ये आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.
तसेच, “ आजच्या या दिनी रुग्णांची सेवा करताना कोरोना बाधित होऊन प्राण गमावलेल्या सर्व डॉक्टर, नर्सेस व पॅरा मेडिकल स्टाफ यांचे मी कृतज्ञापूर्वक स्मरण करतो.” असं देखील राजेश टोपे यांनी म्हटलं आहे.
मोठी बातमी! राज्यातल्या १४ जिल्ह्यांमध्ये करोना निर्बंध शिथिल, नाट्यगृहे, सिनेमागृहे देखील १०० टक्के क्षमतेनं सुरू होणार!
तर, करोनाची स्थिती सुधारत असलेल्या जिल्ह्यांचा समावेश ‘ए’ श्रेणीत करण्यात आला असून उर्वरीत जिल्ह्यांचा समावेश ‘बी’ श्रेणीत करण्यात आला आहे. ए श्रेणीत येणाऱ्या एकूण १४ जिल्ह्यांमध्ये अनेक प्रकारचे निर्बंध शिथिल करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. येत्या ४ मार्चपासून नव्याने करण्यात आलेले बदल लागू होणार आहेत.