पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व बालवाड्यांमध्ये आता एकच अभ्यासक्रम असणार आहे. बालवाडी शिक्षणामध्ये एकवाक्यता असावी, सर्वांना हसत खेळत शिक्षण मिळावे हा यामागील हेतू आहे. त्यासाठी ‘आकांक्षा फाउंडेशन’, ‘विपला फाउंडेशन’, राज्य सरकारच्या ‘आकार’ आणि ‘ग्राममंगल’ यांच्यातर्फे अभ्यासक्रमाची आखणी करण्यात आली असून, उपक्रमशील शिक्षकांचा आणि सामाजिक संस्थांची मदत घेतली जाणार आहे. या संदर्भातील बैठक शुक्रवारी महापालिकेच्या चिंचवड स्टेशन येथील शाळेत पार पडली.
सहा हजारांहून अधिक मुले
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बालवाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. विद्यार्थ्यांची संख्या चांगली असून, बालवाड्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी पालक करीत आहेत. सध्या शहरात एकूण २०४ बालवाड्या असून, ६,७५० मुले शिक्षण घेत आहेत. बालवाडी ही शिक्षणाची पहिली पायरी मानली जाते. अभ्यासाचा पाया पक्का होण्यासाठी हा टप्पा महत्त्वाचा असतो. त्यामुळे बालवाडीत योग्य शिक्षण मिळायला हवे. या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या वतीने लवकरच अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येणार आहे.
हसतखेळत अभ्यासावर भर
शहरातील उपक्रमशील शिक्षक, सामाजिक संस्थांची मदत घेऊन बालवाडीचा अभ्यासक्रम तयार करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांची मानसिकता विचारात घेऊन हसतखेळत अभ्यासावर भर देण्यात येणार आहे. बालवाड्यांमध्ये मुलांना गाणी, गोष्टी शिकवल्या जातात. मात्र, अनेकदा मुलांची मानसिकता विचारात घेतली जातेच असे नाही. त्यामुळे या मुलांच्या बौद्धिक, शारीरिक क्षमतेचा विचार अभ्यासक्रमात केला जाणार आहे.
अभ्यासक्रमात नेमके काय?
मुलांना हसतखेळत शिक्षण दिले तर ते मनापासून आत्मसात करतील. त्यामुळे नव्या अभ्यासक्रमात मुलांच्या शैक्षणिक विकासाबरोबर भावनिक विकासाकडेही लक्ष देण्यात येणार आहे. बालमानसशास्त्राचा विचार करून मुलांचा विकास करण्यावर भर असेल. प्रत्येक विषय शिकवताना गाणी, गोष्टींचा अंतर्भाव केला जाणार आहे.
बालवाडीपासूनच मुलांना अभ्यासाची आवड लागावी यासाठी विशेष अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात येत आहे. या अभ्यासक्रमाच्या निर्मितीसाठी उपक्रमशील शिक्षकांची मदत घेण्यात येणार आहे. त्यामुळे गुणवत्तावाढीसाठी मदत होणार आहे.
– संजय नाईकडे, प्रशासन अधिकारी
विविधांगी विषयांवर चर्चा
महापालिकेच्या वतीने शुक्रवारी घेण्यात आलेल्या बैठकीत सामाजिक संस्था, शिक्षक आणि महापालिका अधिकारी यांची उपस्थिती होती. या वेळी विद्यार्थ्यांचा शारीरिक, बौद्धिक विकास, मानसिक अवस्था या सर्वांचा विचार करून अभ्यासक्रम कसा असावा, याबाबत सखोल चर्चा करण्यात आली. या वेळी चाकोरीबद्ध शिकवण्यापेक्षा विद्यार्थ्यांना कसे नावीन्यपूर्ण पद्धतीने शिकवता येईल यावर भर देण्यात आला.