केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे मत
पुणे : केंद्र सरकार आणि देशातील विविध राज्य सरकारे यांच्यातील संबंध गेल्या काही महिन्यांपासून ताणलेले असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘देशाला प्रगतीपथावर नेण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयातून काम करण्याची आवश्यकता आहे’, असे परखड मत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी शुक्रवारी व्यक्त केले. जगातील काही घटनांमुळे जागतिक शांतता भंग होत असल्याने, देशाच्या प्रगतीला एकप्रकारे आव्हान दिले जाणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित एशिया इकॉनॉमिक डायलॉग या परिषदेच्या समारोप कार्यक्रमात निर्मला सीतारामन बोलत होत्या. सेंटरचे अध्यक्ष डॉ. रघुनाथ माशेलकर आणि उपाध्यक्ष डॉ. विजय केळकर या वेळी उपस्थित होते. सीतारामन म्हणाल्या की, करोनाला रोखण्यासाठी लस आणि औषधींची निर्मिती करून, जागतिक संकटाचा सामना करण्यासाठी आपला देश तयार असल्याचे दाखवून दिले आहे. देशाच्या प्रगतीसाठी आखलेल्या उपाययोजनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रितपणे काम करण्याची आवश्यकता आहे.
देशातील लोकांच्या उत्पन्नातील दरी करोनानंतर वाढली आहे. ही दरी कमी करण्यासाठी केंद्र सरकारकडून उपाययोजना आखण्यात येत आहे. देशाचा पुढील २५ वर्षांचा विचार करता, केंद्र सरकारने हरित उर्जा, पायाभूत सुविधा, आरोग्य आणि शिक्षण या तीन मुद्दय़ांवर लक्ष केंद्रीत केले असून, अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणण्यासाठी हे महत्त्वाचे तीन स्तंभ आहेत. त्यासाठी योजना आखण्यात येत असून, प्रत्येक अर्थसंकल्पात त्यासाठी मोठय़ा प्रमाणात आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे, असेही त्यांनी सांगितले.
केंद्र सरकारने हरित उर्जेवर लक्ष केंद्रीत केले आहे. त्यामुळे औष्णिक वीज प्रकल्पांचा आणि कोळशाचा वापर कमी होउन, पर्यावरणपूरक जगण्यासाठी शाश्वत वातावरणाची निर्मिती होणार आहे. देशातील रस्ते, इमारती, पूल अशा पायाभूत विकासांच्या कामावर प्रामुख्याने भर देण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक कुशल मनुष्यबळाची निर्मिती करण्यात येत आहे. आरोग्य सेवा क्षेत्रात क्रांती आणण्यासाठी रूग्णालयांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. देशात कुशल डॉक्टर उपलब्ध होण्यासाठी विद्यापीठांकडून प्रयत्न केले जात आहे. त्याचप्रमाणे शिक्षणाला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत असून, शिक्षणाच्या प्रवाहात मुलींची संख्या वाढण्यासाठी भर देण्यात येत आहे, असेही सीतारामन यांनी सांगितले.
दुसऱ्या महायुद्धानंतर जगातील शांतता भंग झाली नाही. मात्र, नुकत्याच घडलेल्या काही घटनांमुळे जागतिक शांतता धोक्यात आली आहे. या घटनांमुळे भारताच्या विकासाला अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. या परिस्थितीतही शांतता प्रस्थापित करण्याचे प्रयत्न होऊन, त्याद्वारे शाश्वत पुनुरूज्जीवन होईल.
-निर्मला सीतारामन, केंद्रीय अर्थमंत्री
The post केंद्र-राज्य समन्वयातूनच देशाची प्रगती appeared first on Loksatta.