नवी दिल्ली : भारतपेच्या संचालक मंडळाने अशनीर ग्रोव्हर यांनी केलेल्या गैरवर्तनाबद्दल कारवाई म्हणून कंपनीच्या सर्व पदांवरून त्यांची उचलबांगडी करताना, त्यांचा ‘सह-संस्थापक’ हा दर्जा हिरावून घेतला, तसेच त्यांच्याकडील भागभांडवलावरील मालकीला कात्री लावणारे पाऊल टाकले. बुधवारी त्या संबंधाने कायदेशीर कारवाईदेखील कंपनीने सुरू केली आहे.
ग्रोव्हर यांनी संचालक मंडळाच्या बैठकीला सामोरे जाण्यापूर्वीच मंगळवारी व्यवस्थापकीय संचालकपदाचा तसेच कंपनीच्या संचालकपदाचा राजीनामा दिला. तथापि संचालक मंडळाची मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू राहिलेल्या बैठकीत, सल्लागार कंपनी पीडब्ल्यूसीने केलेल्या तपासाअंती सादर केलेल्या अहवालाच्या आधारे ग्रोव्हर यांच्यावर कारवाई करण्याचा अधिकार कंपनीकडे असल्याचे स्पष्ट केले. शिवाय, त्यांनी संचालक मंडळ आणि बहुसंख्य गुंतवणूकदारांच्या मान्यतेशिवाय राजीनामा दिल्याने, भागधारक कराराच्याअंतर्गत कारवाईसही ते पात्र ठरतील, असे स्पष्ट करण्यात आले. परिणामी ग्रोव्हर यांना त्यांच्याकडील १.४ टक्क्यांपर्यंत भागभांडवलाची मालकीही गमवावी लागू शकेल.
कंपनीचे प्रवर्तक असलेले ग्रोव्हर यांच्याकडे सध्या भारतपेची ९.५ टक्के भागभांडवली हिस्सेदारी असून ते सर्वात मोठे वैयक्तिक भागधारकही आहेत.
The post अशनीर ग्रोव्हर यांनी ‘भारतपे’च्या सह-संस्थापकाचा दर्जा गमावला! ; भागमालकीलाही कात्री लागण्याची शक्यता appeared first on Loksatta.